नवी दिल्ली- पाकिस्तान दौ-यादरम्यान पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद दु:खद होती, असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. अडवाणी यांचे माय कंट्री माय लाइफ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंध सामान्य व्हावेत या हेतूनेच 2005 साली पाकिस्तान दौ-यावर गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जीनांबाबतच्या वक्तव्यावर उद्भवलेल्या वादामुळे झालेल्या वेदना 1996 साली हवाला प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपेक्षा भयंकर होत्या, असे अडवाणी यांनी लिहिले आहे. हवाला प्रकरणात पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिल्यामुळे ते आरोप सहन करणे शक्य झाले. मात्र जीना प्रकरणात पक्षातील अनेक नेत्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्याची खंत मोठी होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
"पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राष्ट्र बनू नये अशीच जीनांची इच्छा होती हेच मला म्हणायचे होते कारण मी पाकिस्तानात शांतीचा दूत बनून गेलो होतो," असे अडवाणी यांनी लिहिले आहे. आपल्या पाकिस्तान भेटीमुळे दोन्ही देशांचे नातेसंबंध सुधारण्यात खरोखरच मदत झाली असा दावाही त्यांनी केला आहे. "मात्र मी खूप गंभीर चूक केली आहे असे पक्षातील काही नेत्यांनी घाईघाईने ठरवून टाकले. मी हिंदुत्त्वाच्या मुद्दयाशी अप्रामाणिक झाल्याची टीका करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे मला पक्षाध्यक्षपद सोडणे भाग पडले," असे अडवाणींनी लिहिले आहे.