मुंबई- वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणा-या वृत्तांतील मजकुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच नियामक संहिता लागू होणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहसचिव झोहरा चटर्जी यांनी सांगितले आहे. भारतीय करमणूक उद्योगावर आधारित फिकी-फ्रेम्स परिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.
"देशातील काही वृत्त प्रसारण संस्थांकडून या आचार संहितेवर मागविलेल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही सध्या आहोत. काही संस्था मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रतिक्रिया पाठविणार आहेत. खरे तर या प्रतिक्रिया जानेवारी महिन्यातच सादर केले जाणे अपेक्षित होते," असे चटर्जी म्हणाल्या.
"वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणा-या वृत्तांवर तसेच कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश न्यायालये सतत माहिती व प्रसारण मंत्रालयाला देत आहेत," असे चटर्जी यांनी सांगितले.मात्र प्रसारण संस्थांपैकी कोणीही आत्तापर्यंत माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे किंवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायकडे व्यवस्थित प्रतिक्रिया पाठविलेल्या नाहीत, असे त्या म्हणाल्या.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने उपलब्ध शिफारशींनुसार नियामक संहितेचा मसुदा तयार केला असून तो मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे चटर्जी यांनी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हा मसुदा न्यायालयापुढेही ठेवण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले.