मंगलोर- भारताने अमेरिकेसोबतच्या नागरी अणू सहकार्य कराराची भीती बाळगू नये, असे आवाहन कॉंग्रेसचे सरचिटणीस व खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. डावे पक्ष तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे या कराराला होणा-या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. गांधी सध्या त्यांच्या डिस्कव्हर इंडिया मोहिमेअंतर्गत कर्नाटक दौ-यावर आहेत.
"अणुकराराबाबत मला एवढेच सांगायचे आहे की कोणत्याही प्रकारचे करार करताना, कोणत्याही देशाशी वाटाघाटी करताना भारतीयांनी भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. भारताने आत्मविश्वासाने अशा प्रकारचे सहकार्य करार करावेत," असे राहुल गांधी म्हणाले. एनएसयुआयने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते टीएमए पै संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
"जगाने आता भारताचे सामर्थ्य ओळखले आहे. मी जेव्हा एखाद्या परदेशी नेत्याशी बोलतो तेव्हा भारताला आता मान्यता मिळू लागलेली आहे ही बाब मला प्रकर्षाने जाणवते," असे गांधी यांनी आवर्जून नमूद केले.
विद्यार्थीवर्गाने देशाच्या प्रगतीत निर्णायक भूमिका बजावावी आणि दारिद्र्य निर्मुलनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन गांधी यांनी केले. प्रगतीसाठी आत्मविश्वास अत्यंत आवश्यक असतो, असेही ते म्हणाले.
देशातील गरीब लोकांसाठीच्या उपलब्ध संधींमध्ये वाढ करून त्यांना त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करणे ही काळाची गरज असल्याचे गांधी म्हणाले. गरिबांशी फटकून न राहता स्वत:ला त्यांच्याशी जोडून घ्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
Source :
PTI