नवी दिल्ली- आपला बीजिंग दौरा तारखांच्या अडचणीमुळे रद्द झाला असून त्याचा तिबेट प्रश्नाशी काहीच संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कमल नाथ यांनी दिले आहे. कमल नाथ एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संयुक्त आर्थिक गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला जाणार होते. चीनसोबतच्या प्राधान्य व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींची पुढील फेरीही या वेळी होणार होती. मात्र हा दौरा रद्द झाल्याचे सरकारी सूत्रांनी जाहीर केल्यामुळे विविध अटकळींना जोर आला होता.
तिबेटमध्ये दोन आठवड्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे कमल नाथ यांचा बीजिंग दौरा रद्द केल्याची चर्चा होती. त्याचप्रमाणे चीनमधील भारताच्या राजदुतांना चीन सरकारने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून त्यांचा दौरा रद्द झाल्याचेही बोलले जात आहे.
भारताच्या चीनमधील राजदूत निरुपमा राव यांना चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी 21 मार्च रोजी पहाटे दोन वाजता बोलावून घेतल्यामुळे भारत सरकार संतप्त झाले आहे. नवी दिल्लीतील चिनी वकिलातीवर तिबेटी बंडखोरांनी हल्ला केल्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राव यांनी बोलावून घेतले होते. भारतातील चिनी वकिलातींवर हल्ले करण्यासाठी तिबेटी लोकांनी आखलेल्या योजनांचे तपशील चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी राव यांच्यासमोर ठेवल्याची वृत्ते आहेत.
भारत सरकारने याबाबत चीन सरकारशी शाब्दिक वाद ओढवून घेणे टाळले असले तरी कमल नाथ यांचा बीजिंग दौरा रद्द करून चीनला निषेधाचे संकेत दिले असावेत अशी चर्चा आहे.