मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या वादात पडण्याची इच्छा नसल्याचे संकेत अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विकत घेतलेली जमीन मूळ शेतक-यांना परत करण्याच्या उद्देशाने केलेले दानपत्र मागे घेण्याच्या अमिताभ बच्चन यांच्या निर्णयाची टर उडविणारी पोस्टर्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जागोजागी लावली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे बच्चन म्हणाले.
"भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला भाषणाचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. मी राज्यघटनेचा आदर करतो आणि तिचे पालनही करतो. यापलीकडे मला काहीच बोलायची इच्छा नाही," असे बच्चन यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. बच्चन अकादमीचे ब्रॅण्ड अंबॅसडर आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वक्तव्यांचा तसेच कृतींचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नसल्याचेही बच्चन यांनी या वेळी स्पष्ट केले.