मुंबई - मुंबईतून जमा होणा-या आयकरात यंदा 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे आर्थक भांडवल आगामी आर्थिक वर्षात आणखी उत्तम कामगिरी बजावेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आयकर वसुलीचे प्रमाण चांगले राहिले आहे. मुंबईने तर त्यात 60 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, त्यामुळे आगामी आर्थिक वर्षातही मुंबई उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी येथे एका कार्यक्रमात शुक्रवारी सांगितले. मोठ्या प्रमाणावर करभरणा करणा-यांसाठीच्या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या केंद्रामुळे करदात्यांना अधिक चांगल्या वातावरणात करपरतावा भरता येईल, असे त्यांनी सांगितले. बंगलोर आणि चेन्नईनंतरची लार्ज टॅक्स पेयर युनिट असणारे मुंबई हे तिसरे केंद्र आहे, अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.