चेन्नई - ऑस्ट्रेलियातील चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांमधून वगळल्यानंतर मला फारच वेदना झाल्या होत्या. त्यामुळे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आपण आसुसलो होतो व त्यातूनच आजची खेळी साकारली असे विरेंदर सेहवागने तिस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बातमीदारांना सांगितले. आजच्या दिवसावर केवळ त्याचेच वर्चस्व राहिले. आज साकार केलेली 309 धावांची नाबाद खेळी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी असल्याचेही तो म्हणाला.
या सामन्यांमधून वगळण्यात येणे तसे माझ्यासाठी लाभदायक ठरले कारण त्यानंतरच मी अधिक निर्धाराने खेळ करु शकलो. वातावरणातील आर्द्रतेने शरीरातील पाणी संपत होते मात्र नारळपाणी व मीठ घेऊन मी जलशुष्कता टाळण्याचा प्रयत्न करीत होतो, असे त्याने सांगितले. त्यासाठी संघाचे फिजीयो आणि पियुष चावला व इरफान पठाण या सहका-यांनी मोलाचे योगदान दिले, असेही तो म्हणाला.