बीजिंग- तिबेटची राजधानी ल्हासा येथे झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चीन सरकार भरपाई देणार आहे. ल्हासामध्ये बौद्ध भिक्खुंच्या निदर्शनांनंतर उसळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांनाही मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आल्याचे झिन्हुआ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने काल रात्री प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे.
चीनच्या अधिपत्याखालील तिबेटमध्ये तसेच पश्चिम चीनच्या तिबेटी बहुसंख्य भागांत दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे लागले आहे. येत्या ऑगस्टमध्ये बीजिंग शहरात होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेबाबतही पाश्चात्त्य राष्ट्रे चिंता व्यक्त करत आहेत.
जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून चीनने केलेली प्रगती संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी या ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल, अशी आशा चीन सरकार बाळगून होते. मात्र तिबेटच्या स्वायत्ततेची मागणी करणा-या बौद्ध भिक्खुंविरोधात लष्कराचा वापर केल्यामुळे चीनने आंतरराष्ट्रीय समुहाची टीका ओढवून घेतली आहे.
गेल्या 14 मार्च रोजी चीनच्या सरकारविरुद्ध ल्हासामध्ये झालेल्या हिंसाचारात 18 नागरिक मरण पावल्याचा चीन सरकारचा दावा आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याचप्रमाणे घरांमध्ये व दुकानांमध्ये लुटालुट, जाळपोळ केली, असाही सरकारचा दावा आहे.
या हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख येन्सची मदत देण्यासाठी तिबेटच्या प्रादेशिक सरकारने अधिसूचना काढल्याचे झिन्हुआच्या बातमीत म्हटले आहे. नागरिकांना घरांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यात येणार आहे, असेही या अधिसुचनेत नमूद करण्याच आले आहे.
तिबेटी धार्मिक नेते दलाई लामा 1959मध्ये भारतात निघून आल्यानंतर स्थापन झालेल्या तिबेटच्या हद्दपार सरकारच्या मते या हिंसाचारात सुमारे 140 जण मरण पावले आहेत आणि त्यातील बहुतेक तिबेटी आंदोलक आहेत.
Source :
UNI