श्रीनगर - भारतीय सैन्यावर पाकिस्तानी हद्दीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील गोळीबाराचा भारत तीव्र निषेध व्यक्त करणार आहे. भारतीय हद्दीत काही शस्त्रास्त्रधारी व्यक्ती येत असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला विरोध केल्यानंतर पाकिस्तानी हद्दीतून हा गोळीबार झाला होता. गुरुवारी रात्री सांबा परिसरात हा गोळीबार झाला होता. हा गोळीबार दहशतवाद्यांकडून अथवा पाकिस्तानी लष्कराकडून झाला याची आपल्याला कल्पना नसली तरी या प्रकाराचा पाकिस्तानकडे निषेध करणार असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर देत भारतीय हद्दीत घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला. या गोळीबारात भारताची कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, असेही या अधिका-याने सांगितले.
परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांची पाकिस्तान भेट तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार करण्यात आला.