नवी दिल्ली - देशाला भेडसावणा-या चलनवाढीची समस्या लवकरच आटोक्यात येईल, असा आशावाद व्यक्त करत यासाठी विनाकारण काळजी करु नये, असा सल्ला देशातील दोन प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. सरकारकडून चलनवाढीला आटोक्यात ठेवण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांचे परिणाम येत्या काही आठवड्यात दिसून येतील, असे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनी सांगितले, तर येत्या चार महिन्यात चलनवाढीचा दर पाच ते सहा टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा विश्वास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी व्यक्त केला.
सरकारच्या उपाययोजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती काही आठवड्यात, महिन्यातच खाली येतील, त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही, असे अहलुवालिया यांनी सांगितले. 26 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात चलनवाढीने विक्रमी 7.61 टक्क्यांचा आकडा गाठला आहे. त्याचबरोबर देशाच्या औद्योगिक उत्पादनातही घट झाली आहे.
येत्या तीन ते चार महिन्यात चलनवाढ सहा टक्क्यांपर्यंत खाली येईल व साडेपाच टक्क्यांपर्यंत स्थिरावेल, मात्र त्यासाठी मान्सून व इतर बाबी कशा राहतात ते महत्त्वाचे आहे, असे सी. रंगराजन म्हणाले. खनिज तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत वाढ झाली आहे, ही मात्र अत्यंत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.