इस्लामाबाद - जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत 60 जण ठार झाल्याच्या आणि पाकिस्तानकडून चिथावणीखोर गोळीबार होण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानकडे दहशतवादाशी लढा देण्यासाठी साथ देण्याची मागणी केली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांकडून इस्लामाबादमध्ये मित्रत्वाच्या आणि आत्मविश्वासाच्या वातावरणात सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या चर्चेच्या कार्यक्रमपत्रिकेवर दहशतवाद, जम्मू-काश्मीर, शांतता व सुरक्षा यासारखे आठ मुद्दे आहेत.
दोन्ही देशांमध्ये 2004 साली ही चर्चा सुरू झाली असून त्यानंतर तब्बल चार वर्षांनी आता ही चर्चा होत आहे. पाकिस्तानात मार्च महिन्यात लोकशाहीवादी सरकारने सूत्रे हातात घेतल्यानंतर ही चर्चा सुरू होत आहे. भारताच्या वतीने शिवशंकर मेनन व पाकिस्तानच्या वतीने सलमान बशीर हे या चर्चेचे नेतृत्व करीत असून परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी हेदेखील पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत. पाकिस्तानात स्थापन झालेल्या लोकशाही सरकारमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या आशा उंचावल्या आहेत, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले. मुखर्जी हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ व पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांची बुधवारी भेट घेणार आहेत.