मुंबई - राखी सावंतची स्तुती करणारे तसे कमीच. मात्र विद्या बालनसारख्या संवेदनशील अभिनेत्री सध्या राखीची भरभरुन स्तुती करताना दिसत आहे. राखीने तिच्या टॉक शोसाठी विद्या बालनला बोलावले होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान म्हणे राखीतील चांगुलपणाची आणि व्यावसायिकतेची विद्याला ओळख झाली, व आता तर तिला राखीची स्तुती करताना शब्दही अपुरे पडू लागले आहेत.
राखीने या उद्योगात आपले स्थान बळकट केल्याबद्दल तिचे कौतुक करायलाच हवे. स्वत:ला उद्योगात तिने फारच उत्तम रितीने स्थापित केले आहे, असे विद्या म्हणाली. राखीसोबत चॅट शोमध्ये काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता, मात्र राखीने निमंत्रण पाठवल्यानंतर क्षणाचाही अवधी न लावता त्यास होकार दिला असे ती म्हणते. राखीच्या या कार्यक्रमात आमीर खाननेही भाग घेतला आहे. माझ्या एपिसोडचे चित्रीकरण झाल्यानंतर आमीर खानही त्याच कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तेथे आला, असे विद्याने सांगितले. राखीची मुलाखत घेण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी होती, असेही ती म्हणाली.